नगर (प्रतिनिधी) – वीकेंड लॉकडाऊनचा नगरकरांना थोडासा दिलासा मिळाला असून, रुग्ण संख्येत सुमारे पाचशे रुग्णांची घट झाली आहे. जिल्ह्यात काल दोन हजार 414 इतकी रुग्ण संख्या आढळली होती. तर, आज एक हजार 998 इतकी रुग्ण संख्या आढळली. दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण कमी होण्याचा वेग नगर शहरामध्ये आहे. नगर शहरात काल 531 रुग्ण आढळून आले होते. तर, आज 382 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण वाढीचे प्रमाण कमी झाले असले तरी आज अमरधाममध्ये सुमारे 43 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे स्थानिक यंत्रणेने सांगितले.
महिनाभर कडक लॉकडाऊन करावा : आयएमएची भूमिका
नगर (प्रतिनिधी)- राज्यात व नगर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वगाने वाढत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण अत्यवस्थ असून, त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात खाटा शिल्लक नाहीत. त्यामुळे संसर्ग साखळी तोडण्यासाठी एक महिन्याचे कडकडीत लॉकडाऊन केले तर रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
रुग्णसंख्या वाढत असून, उपचारांसाठी खाटा शिल्लक नाहीत. सर्व खासगी कोविड सेंटरमध्ये डॉक्टर दिवसरात्र सेवा देत आहेत. बेड, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने एक ते दोन आठवड्यात परिस्थिती अत्यंत भयंकर होण्याची शक्यता आहे.
रेमडेसिविरचा वापर कमी झाल्याने मागील दोन महिन्यांत त्याचे उत्पादन कमी झाले होते. आता अचानक मागणी वाढल्यानंतर त्याचा पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजन पुरवठाही कमी पडत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन करण्याचा विचारा करवा, असे आयएमएचे म्हणणे आहे.