नेवासा – ‘हे विश्वची माझे घर’ हा संदेश संपुर्ण जगाला नेवासा येथून देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्यामुळे भक्तांना माऊली चरणी लीन होण्यासाठी खडतर मार्गाने जावे लागत आहे. जगाच्या नकाशावर धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून नोंद असणाऱ्या संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर बसून व्यापून टाकला आहे. याकडे महसूल आणि पोलिसांची भूमिका नेहमीच कुचकामी ठरत असल्यामुळे माऊलींच्या दर्शनापूर्वी भाविकांना रस्ता अडवणाऱ्यांच्या कटकटीला सामोरे जावून मार्ग काढावा लागत आहे.
संत ज्ञानेश्वर मंदिर भक्त परिवार व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे संत ज्ञानेश्वर मंदिराकडे शहरातून जाणारा मुख्य रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे महंत शिवाजीमहाराज देशमुख यांच्यासह शहरातील सामाजिक संघटनांनी आंदोलन केल्यानंतर काही दिवस अतिक्रमणामुक्त रस्ता होतो. पण त्यानंतर पुन्हा हा रस्ता ‘जैसे थैच’ हा रस्ता होत असल्यामुळे प्रशासनाच्या कुचकामी भूमिकेबाबत सर्वसामान्यांमध्ये चिड निर्माण झाली आहे.
संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता निट नसल्यामुळे नेवासकरांची मान शर्मेने खाली जात असतांना प्रशासन ‘मुग गिळून’ गप्प का? माऊलीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्त वाहनातून दर्शनासाठी येत असतात. मात्र खोलेश्वर गणपती मंदिरापासून नगरपंचायत चौकातून मंदिराकडे जाण्यासाठी वाहनांना कसरत करावी लागते. स्थानिक व्यापारी आणि भक्तांचे वादविवाद होतात. व्यापारी भाविकांना वरचढ बनत असल्यामुळे कटकटी आणि वादविवाद टाळून भक्त शनिशिंगणापूर, देवगडकडे निघून जात असून पर्यायाने देवस्थान विकासापासून आणि भाविक दर्शनापासून दुर जात आहे.
महसूल आणि पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालून मंदिराकडे जाणारा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची गरज निर्माण झालेली आहे. फळविक्रेत्यांनी रस्त्यावर हातगाड्या, तसेच रस्त्यावर फळविक्री करण्यासाठी बसत असल्यामुळे हा रस्ता अतिक्रमणात अडकलेला आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी ‘समझोता एक्सप्रेस’ राबवून व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होणार नाही आणि भक्तांनाही सुलभ दर्शन घेण्यासाठी वाहनांना अडथळा येणार नाही, असा समोपचाराने मार्ग काढला पाहिजे.
‘पैस’ खांब दर्शनापासून भाविक वंचित
महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिरातील ‘पैस’ खांबाच्या दर्शनाला भाविकांना मुकावे लागत असून माऊलीच गाव म्हणून नेहमी परजिल्ह्यात भाविक येत असतात पण त्यांना वाहन घेऊन जाताना कसरत करावी लागते. तरी प्रशासनाने हा रस्ता अतिक्रमणमुक्त करावा अशी मागणी होत आहे.