चंदिगड – एखाद्या तरुणाचे लग्नाचे वय झाले नसेल, पण तो जर कायद्याने सज्ञान असेल तर त्याला सज्ञान जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रौढ जोडप्याला एकत्र राहण्याचा अधिकार आहे. फक्त मुलाचे वय लग्नायोग्य नाही म्हणून तो अधिकार नाकारता येणार नाही, असे मत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने नोंदवले.
भारतात तरुणांना वयाच्या 21व्या, तर तरुणींना 18 व्या वर्षी विवाहाचा अधिकार प्राप्त होतो. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लग्नाचे वय न गाठलेल्या, मात्र कायद्याने सज्ञान (18 वर्षांवरील) व्यक्तींना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार मिळाला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून सज्ञान जोडप्याला मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असे न्या. अल्का सरीन यांच्या खंडपीठाने नमूद केले.
एखाद्या व्यक्तीने त्याचं किंवा तिचं आयुष्य कसं जगावे हे समाज ठरवू शकत नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्रय हा जगण्याच्या अधिकाराचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रकरणामध्ये तरुणी सज्ञान आहे. त्यामुळे तिने कोणासोबत आयुष्य घालवावे, हे ठरवण्याचा अधिकार तिच्या पालकांना नाही. पालकांना मुलांवर आपल्या अटी लादण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.