मुंबई : अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत. आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजातून हे लोकही येत असतात. यासाठी त्यांचे वाईट विचार संपवणे महत्त्वाचे आहे. समाजाला एक चांगला विचार देणे गरजेचे असून, प्रत्येक भारतीयांना देशाचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे ही जाणीव झाली पाहिजे, असे विचार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
जागतिक दहशतवादविरोधी (जीसीटीसी-ग्लोबल काउंटर टेरेरिझम कौंन्सील) परिषदेने अवैधरित्या पैशाचा व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद या विषयावर जागतिक वेबिनारचे आयोजन केले आहे. ही परिषद जोखीम अनुपालन व्यावसायिक संघटना (आरसीपीए) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर भारतीय संशोधन परिषद (आयसीआरआयईआर) आणि इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (आयएसआयएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. हा वेबिनार दोन दिवसीय असून, या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ज्या संघटना किंवा संस्था दहशतवाद वाढविण्यासाठी आर्थिक सहकार्य करतात यामध्ये उच्च विद्याविभुषीत लोक कार्यरत असल्याचे दिसून येते, यामुळे त्यांचे विचार कसे बदलवावे आणि समाजाला एका वेगळ्या विचारापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य कसे करता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण उच्च शिक्षीतांमध्येही जाती-धर्म-पंथ-विचार यावरून गैरसमजुती पसरवल्या तर त्यांचे रूपांतर राक्षसी प्रवृत्तीमध्ये होऊ शकते असे दिसते. यामुळे चांगले विचार समाजाला देऊन त्याचा प्रसार करण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे गरजेचे असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
राज्यपाल पुढे म्हणाले, काश्मीर पासून मुंबई ते अमेरिकापर्यंत सगळ्यांनाच या दहशतवादाचा सामना करावा लागला आहे. या दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ही जागतिक समस्या झाली आहे. या आर्थिक दहशतवादावर निर्बंध लादण्यासाठी जागतिकस्तरावरही नियम आखण्यात आले आहेत. आपली ही जीसीटीसी संघटना जागतिकस्तरावर कार्य करणारी संघटना आहे. आपण आपल्या दोन दिवसीय परिषदेत केवळ एक किंवा दोन देशांतील दहशतवादाचा विचार न करता जागतिकस्तरावरचा विचार केला तर उपाययोजनांपर्यंत आपण पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. भारतातील अनेक तज्ज्ञ या संघटनेत आहेत, हे तज्ज्ञ शासकीय सेवेतून निवृत्त होऊनही या दहशतवाद या विषयावर अतिशय गंभीरपणे चर्चा करून उपाय आखण्याचे प्रयत्न करीत असल्याने जीसीटीएसचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यास राज्यपाल कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्या.
या वेबिनारमध्ये सेवानिवृत्त आयपीएस आणि ॲन्टी मनी लाँडरिंग आणि फायनान्स टेरेरिझम २०२० चे अध्यक्ष कर्नल सिंग, सेवानिवृत्त आयएफएस आणि ग्लोबल काऊंटर कौन्सीलचे सल्लागार बोर्डचे अध्यक्ष डॉ.कनवाल सिबल, निवृत्त आएएस आणि ग्लोबल काऊंटर टेरेरिझम कौंन्सीलचे डॉ. शेखर दत्त, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल आणि खासदार विवेक तानखा आदीं तज्ज्ञांनी यावेळी या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ग्लोबल काऊंटर टेरेरिझम कौंन्सील (जीसीटीसी)चा इतिहास, कार्य, उद्दीष्टे आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत माहिती दिली.