मुंबई : राज्यसभा निवडणुकांच्या सुरवातीपासून ते अगदी निकाल लागेपर्यंत नाट्यमय घडामोड़ी घडल्या. या निवडणुकित भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यानंतरही निवडणुकीच्या परिणामांवरून राज्यात एकमेकांवर जोरदार शेरेबाजी सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभाव झाल्यानंतर संजय राऊत यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.’ हरभरे टाकले की ते कुठेही जातात जिकडे हरभरे तिकडे घोडे असतात’ अशी प्रतिक्रिया देत संजय पवार यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत यांनी अपक्ष उमेदवारांवर फोडले आहे.
हरभरे टाकले की घोडे कुठेही जातात
याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊत यांनी म्हंटल की , ” काही घोडे बाजरात नेहमीच असतात. हरभरे टाकले की ते कुठेही जातात जिकडे हरभरे तिकडे घोडे असतात. अशाच काही घोड्यांनी दगाबाजी केली आहे. त्यामुळेच आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. आम्ही त्यांना पाहून घेऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय पुढे बोलताना ते म्हणाले, आघाडीसोबाबत असलेल्या अपक्षांमुळे मते फुटली असली तरी आघाडीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही विशेषतः महाराष्ट्रात घोडे इकडे असतील किंवा तिकडे असतील ते हरभरे टाकले की कुठेही जातात असा हल्लाबोल त्यांनी केला.
आम्ही सूचनांचे पालन केले
घोडेबाजार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी हरभरे खाणारा आहे की नाही ही उद्धव साहेबांना माहित आहे’. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीत अपक्षांकडून मते फुटण्याचा प्रकार झाला आहे असे नाही. महाविकास आघाडीकडून ज्या सूचना आल्या होत्या त्याचे देखील आम्ही पालन केले. शिवाय मी एकटाच अपक्ष आहे असे नाही. अनेक अपक्ष आमदार आहेत. असे अशी प्रतिक्रिया संजय मामा शिंदे यांनी दिली आहे.