नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना उद्या (बुधवार) मोदी सरकारशी पुन्हा चर्चा करण्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होऊ नये, अशी भूमिका त्या संघटनांनी घेतली आहे.
चर्चेच्या पुढील फेरीसाठी तारीख निश्चित करावी, असा प्रस्ताव मोदी सरकारकडून शेतकरी संघटनांना देण्यात आला आहे. त्यावर शेतकरी संघटनांकडून मंगळवारी निर्णय अपेक्षित होता. मात्र, तो निर्णय एक दिवस लांबणीवर टाकण्यात आला.
आता बुधवारी देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत सरकारबरोबरच्या चर्चेविषयीचा निर्णय होईल. अर्थात, कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीवर ठाम असल्याचे शेतकरी संघटनांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांनी त्या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असा आग्रह धरण्यासाठी शेतकरी संघटना ब्रिटीश खासदारांना पत्र पाठवणार आहेत.