इस्लामपूर – माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या किसान आत्मनिर्भर यात्रेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कडकनाथ यात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या किसान आत्मनिर्भर सभेच्या समारोपामध्ये
कडकनाथ कोंबड्या उधळणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव यांनी जाहीर केले आहे.
कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भाजपकडून २४ डिसेंबरपासून “किसान आत्मनिर्भर यात्रा” काढण्यात येणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीमधून जाहीर केले आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून टीका करत या यात्रेच्या विरोधात कडकनाथ यात्रा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यातील गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, मग आत्मनिर्भर यात्रा काढावी, अशी टीका केली आहे. तसेच आम्हीही कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेवून कडकनाथ यात्रा काढू, असे खराडे यांनी जाहीर केले आहे.
तसेच भाजपाच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा २७ रोजी सांगली जिल्ह्यातील पेठ -इस्लामपूर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. त्याच ठिकाणी कडकनाथ यात्रेचाही समारोप करून फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळू, असा इशारा खराडे व जाधव यांनी दिला आहे.
सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना खराडे म्हणाले, की केंद्राच्या कृषी धोरणाचे समर्थन करणाऱ्या सदाभाऊ यांनी हा कायदा एकदा डोळ्याखालून घालावा. या कायद्यात कॉन्ट्रॅक्ट फर्मिंगचेही एक विधेयक आहे. कडकनाथ कुक्कुट पालन हेसुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होते. पण कडकनाथ स्कीममुळे शेतकऱ्याचा फायदा झाला की तोटा? हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुण्यासह मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. अनेकांनी आत्महत्या केल्या.
जमिनी गहाण ठेवून, दागिने विकून लाखो रुपये शेतकऱ्यांनी गुंतविले. शेतकऱ्यांना काय मिळाले, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फायद्याचे आहे? हे कोणत्या तोंडाने सदाभाऊ शेतकऱ्यांना सांगणार हा आमचा सवाल आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि उद्योगपती यांच्यात करार झाला आणि संबधित कंपनीने शेतीमाल नेला नाही, तर हा वाद प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सोडवायचा आहे. त्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर न्यायालयात जाण्याची तरतूद नाही. याचा अर्थ पैशाच्या जोरावर उद्योगपती प्रशासकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करतील आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावतील. हेच यातून स्पष्ट होत आहे. हा कायदा सरळ सरळ उद्योगपतीचे हित साधणारा आहे.
सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या निघणाऱ्या किसान आत्मनिर्भर यात्रेला उत्तर म्हणून कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेवून आम्हाला न्याय द्या, आमचे पैसे परत द्या, असे आवाहन करत कडकनाथ यात्रा काढणार असून त्याची सांगता इस्लामपूर येथे फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळून करणार असल्याचा इशारा खराडे व भागवत जाधव यांनी दिला आहे.