मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी म्हाडाकडे (Mhada) पडून असणाऱ्या 11 हजार घरांच्या किंमती कमी करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेमुळे स्वतःच्या घराच्या चावीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील हजारो नागरिकांना लाभ होणार आहे.
सद्यस्थितीत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. पण आता म्हाडा या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हाडाने आपल्या 11 हजार घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी दिली. या निर्णयानुसार गत अनेक दिवसांपासून लॉटरी प्रक्रियेनंतर पडून असणाऱ्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. या घरांच्या किंमतीचा आढावा घेऊन त्यांच्या पुनर्विक्रीचा पुढील निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, म्हाडाच्या सुमारे 11 हजार घरांच्या किंमती कमी होणार आहे. ही घरे लॉटरी प्रक्रियेनंतर पडून आहेत. म्हाडाला या घरांचे वीज बिल व पाणी पट्टी भरावी लागत आहे. त्यावर मोठा पैसा खर्च होतो. त्यामुळे म्हाडाने या घरांच्या किंमती करून त्यांची पुनर्विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री सावे यांनी सांगितले. यामुळे नुकसान टळून महसूल वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुठे किती सदनिका उपलब्ध?
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.