अमित शहांचा उत्तराखंडमध्ये आरोप
सहसपूर (उत्तराखंड) – रोहिंग्य मुस्लिमांना उत्तराखंड मध्ये स्थायिक होण्यासाठी कॉंग्रेसने मदत केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला असून याद्वारे कॉंग्रेसने पुन्हा तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केले असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना शहा म्हणाले, हरीश रावत यांनी उत्तराखंडमध्ये मुस्लिम विद्यापीठ बांधणार असल्याचे सांगितले आहे.
हा तुष्टीकरणाचाच एक प्रकार आहे. रोहिंग्या मुस्लिम उत्तराखंड मधे दिसू लागले आहेत. धामी यांना पुन्हा मुख्यमंत्री केले तर या राज्यातून रोहिंग्या मुस्लिमांचे उच्चाटन केले जाईल असे वचन मी तुम्हाला देतो असेही त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे, पंतप्रधान मोदी राज्यात चार धाम विकसित करण्याचे काम करतात, तर दुसरीकडे, कॉंग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातात आणि रोहिंग्यांना रेशन कार्ड आणि ओळखपत्र देण्याचे काम करतात असे ते म्हणाले.
गृहमंत्री म्हणाले की, प्रियंका गांधी वाड्रा त्यांच्या कुटुंबातील चौथ्या पिढीतील आहेत आणि प्रत्येक पिढीने प्रत्येक एक धाम विकसित करण्याचे काम केले असते तर भाजपकडे काम करण्यासारखे काहीही राहिले नसते.
बद्रीधामची पुनर्बांधणी 70 वर्षे झाली नाही. चार धामपर्यंत जाण्यासाठी त्यांनी सर्व हवामानात चालेल असा रस्ता बांधला नाही, पण आज तुम्हाला चार धाम आठवते कारण तुम्हाला आज मते हवी आहेत असे ते कॉंग्रेसला उद्देशून म्हणाले.