सविंदणे -सध्या डिंभा धरणाच्या उजव्या कालव्याल्या आवर्तन सुटले असून हे पाणी टेल टू हेड असे न सोडता कोणत्याही गावात कधीही सोडले जात आहे. यामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्या अनेक गावच्या पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडल्या आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, सविंदणे, मलठण भागातील शेतकऱ्यांची कांदा, ऊस, मका, भुईमुग पिके पाण्यावाचून जळून चालली आहे. सध्या या भागातील शेतकऱ्यांची अवस्था धरण उशाला, कोरड घशाला अशी झाली आहे. पाटबंधारे विभागातील कर्मचारी पाणी सोडताना भेदभाव करीत आहे, असा आरोप संतप्त शेतकऱ्यांमधून होत आहे.
उसाच्या बिलातून पाणीपट्टी आकारली जात असतानाही पाणी वेळेवर भेटत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे गाव भेट दौऱ्यावर सविंदणे येथे आले होते. त्यावेळी पाण्याविषयी आपल्या व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या होत्या. पंरतू अद्यापही पाणी न मिळाल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.
या विषयी पाटबंधारे अधिकारी पाठक यांना संपर्क केला असता आधी तुम्ही तुमच्याकडे किती विहिरी आहे ते मला सांगा. पाणीपट्टी गोळा करा, मग पाणी सोडू, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. हे पाटबंधारे आधिकारी, कर्मयारी या भागात येऊन पाटर्या झोडत असल्याची चर्चा नागरीकांमधून होत आहे. त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.