पाटस येथील टोल नाक्यावर तब्बल दोन किलोमीटर रांगा
वरवंड -पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशीही फॅस्टॅगच्या गोंधळामुळे सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे महामार्गावरील वाहतुक वीस्कळीत झाली होती. सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांची दोन किलोमीटर, तर पुण्याकडून येणारी वाहने पाटस गावातील ब्रीजपर्यंत रांग लागली होती.
पाटस टोल नाक्याजवळून दौंडकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गाला वाहने आडवी असल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. दौंडकडून येणाऱ्या आणि दौंडकडे जाणाऱ्या वाहने बराच वेळ अडकून पडली. त्यामुळे वाहनचालक कमालीचे वैतागले होते. भलीमोठी रांग लागल्यामुळे काही वाहने विरुद्ध दिशेने टोल नाक्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होती.
यात काही महाभाग वाहनचालकांनी शिस्तीला तिलांजली देत वाहने पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच पाटस येथील टोल नाक्यापासून पुढे बारामती फाटा आहे. या फाट्यावरील महामार्गावर वाहने उभी असल्याने बारामतीकडे जाणारी वाहने आणि बारामतीकडून पाटसकडे येणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकली. वाहनचालकांना मोठा त्रास यामुळे सहन करावा लागत आहे.
स्थानिक शेतकरी आणि कुरकुंभ येथे जाणाऱ्या कामगारांना टोल नाका ओलांडून पलीकडे जावं लागतं; परंतु ट्रॅफिकमुळे पलीकडे दुचाकी जाण्यासाठी मार्ग राहत नाही, टोल नाक्यावरून पलीकडे जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. टोल नाका प्रशासनाचा मनमानी कारभार आहे. याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. आठ दिवसांत नागरिकांची गैरसोय दूर झाली नाही तर तहसीलदारांना अर्ज करून टोल नाक्याविरोधात उपोषण करणार आहे. -दादासाहेब भंडलकर, ग्रामस्थ पाटस.