मंदीचा फटका : अवघे अडीच महिने राहिल्याने महसुलात घट होण्याची शक्यता
– विष्णू सानप
पिंपरी – चालू आर्थिक वर्ष वाहन उद्योगांसाठी मंदीचे वर्ष ठरले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून वाहनांच्या विक्रीत होत असलेली घट मंदीची द्योतक ठरली आहे. देशभरात वाहनविक्रीत घट होत असतानाच ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या आरटीओला देखील मंदीचा फटका बसत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गत वर्षी गोळा झालेल्या महसुलाच्या आधारावर या आर्थिक वर्षात सुमारे 656 कोटी महसूल प्राप्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अवघे अडीच महिने उरले आहेत आणि डिसेंबर अखेरपर्यंत आरटीओला केवळ 430 कोटी रुपये महसूल जमा करता आला आहे.
वाहन नोंदणी घटल्याने यंदाचे आर्थिक वर्षे “आरटीओ’साठी आव्हानात्मक ठरत आहे. यंदाचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्याचा फटका “आरटीओ’च्या उत्पन्नाला बसला असून, त्यांना दिलेल्या अपेक्षित उत्पन्नापेक्षा पुढे जाता आले नाही. या नऊ महिन्यात 430 कोटी उत्पन्न जमा झाले आहे. वाहन नोंदणीतील निरुत्साही वातावरणामुळे महसुलावर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले.
“आरटीओ’ने यंदाच्या एप्रिल 2019 ते मार्च 2020 पर्यंत 655.91 कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न ठेवले होते. वाहन विक्री मोठ्या प्रमाणात होणारे सर्व सण देखील येऊन निघून गेले मात्र, अपेक्षित वाहन नोंदणी न झाल्याने आरटीओला लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक असणारा महसूल अद्याप तरी जमा करता आला नाही. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आरटीओला जवळपास 430 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर, या वर्षात जवळपास 1 लाख 30 हजार 798 वाहनांची नोंद झाली आहे.
सन 2018 ते 2019 या दरम्यान “आरटीओ’ने जवळपास सहाशे कोटीपर्यंत उत्पन्नाचा आकडा गाठला होता. 610 कोटींचे लक्ष्य निश्चित करुन 596. 27 कोटीपर्यंत आरटीओने मजल मारली होती. तर, 2017 ते 2018 हेच उत्पन्न 555.7 कोटी होते. लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आरटीओला उरलेल्या काळात सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपयांचा महसूल जमा करावा लागणार आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी या काळात मोठ्या प्रमाणात वाहन विक्री होते. हे सर्व सण झाले आहेत, त्यामुळे उरलेल्या काळात सव्वा दोनशे कोटी रुपये जमा करणे अवघड आहे.
काय आहेत कारणे?
वाहनविक्रीच्या वेगाला ब्रेक लागण्याचे मुख्य कारण मंदी हे मानले जाते. परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बीएस-4 इंजिनची वाहनांची विक्री लवकरच बंद होऊन बीएस-6ची वाहने येणार आहेत. बीएस-4 वाहने येण्यापूर्वी स्टॉकमधील वाहनांना कंपन्यांनी नाईलाजास्तव मोठी सूट दिली होती. अशीच सूट मिळण्याच्या अपेक्षेने बरेच ग्राहक मार्च अखेरची वाट पाहत आहेत. याशिवाय येत्या काळात पेट्रोल, डिझेलची वाहने बंद होऊन इलक्ट्रिक वाहने सुरु होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे देखील वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. तसेच सध्या उद्योगांमध्ये असलेल्या मंदीमुळे ग्राहकही वाहन कर्ज डोक्यावर घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे मंदीचा फटका केवळ उद्योग आणि नागरिकांनाच नव्हे तर सरकारी तिजोरीलाही बसताना दिसत आहे.