मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. या 12 जणांच्या यादीत जर माझे नाव असल्यास ते नाव वगळावे, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली.
राजू शेट्टी यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. दरम्यान, 5 एप्रिलला जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
राजू शेट्टी म्हणाले, एका बाजूला सरकारच्या धोरणांना विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला सरकारने सुचवलेल्या विधानपरिषद सदस्यत्व स्विकारणे हे नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. त्यामुळे मी राज्यपालांना भेटून या 12 नावांच्या यादीतून माझं नाव वगळावे, अशी विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली.
मला आता विधानपरिषदेचा सदस्य होण्यात कोणताही रस नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी सर्व निवडणुका स्वाभिमानी पक्षाच्या बॅनरखाली लढवणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विचारांशी बांधील राहून, जनतेच्या हितासाठी जे उमेदवार निवडणूक लढवू इच्छित आहेत, त्यांना संधी दिली जाईल अशी माहितीही स्वाभिमानीकडून देण्यात आली.