कोलंबो – भारताचा शेजारील देश श्रीलंकेत हाहाकार माजला आहे. रुग्णालयातील औषधे संपल्याने डॉक्टरांनी रुग्णांचे ऑपरेशन थांबवले आहे. पेट्रोल पंपावर इंधनासाठी दोन किलोमीटर लांब रांगा लागल्यात. खाद्यपदार्थ इतके महाग झालेत की लोकांना उपाशी झोपावे लागतेय. येथे पेट्रोलपेक्षाही महाग दूध विकले जात आहे. कोलंबो न्यूजच्या रिपोर्टनुसार, एक लिटर दुधासाठी 2000 रुपये खर्च करावे लागतात.
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका कप चहाची किंमत 100 रुपयांवर गेली आहे. मिरची 700 रुपये किलोने विकली जात आहे. तर एक किलो बटाट्यासाठी 200 रुपये मोजावे लागतात.
इंधनाच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीवरही परिणाम झाला आहे. आता अनेक शहरांमध्ये 12 ते 15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा परिस्थितीत भारताने श्रीलंकेला तातडीने एक अब्ज डॉलर्स दिले आहेत.
श्रीलंकेवर अनेक देशांचे कर्ज आहे. येथे जानेवारीमध्ये परकीय चलनाचा साठा 70 टक्क्यांहून अधिक घसरून $2.36 अब्ज झाला होता, जो सातत्याने घसरत आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशात जीवनावश्यक वस्तू, औषधे, पेट्रोल, डिझेल यापैकी बहुतांश वस्तू विदेशातून आयात केल्या जाऊ शकत नाहीयेत.
जानेवारी मधील या अहवालात असे सांगण्यात आले होते की, नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 दरम्यान श्रीलंकेतील अन्नधान्य महागाई एका महिन्यात 15 टक्क्यांनी वाढली होती.
लोकांना ब्रेडचे पॅकेट $0.75 (150) रुपयांना विकत घ्यावे लागते. एवढेच नाही तर एक किलो तांदूळ आणि साखरेचा भाव 290 रुपये किलोवर पोहोचला आहे. सध्या लोकांना एका चहासाठी 100 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो.