सातारा – वाई तालुक्यात ग्राम बीजोत्पादन अंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणे पेरणी केलेले उडतारे गावचे सुनील शंकर जगताप या शेतकऱ्याच्या प्लॉटला कृषीमंत्री दादासाहेब भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, आ.महेश शिंदे यांनी भेट दिली.
यावेळी टोकण पद्धतीने सरीवर सोयाबीन पेरणी केल्याने एकरी फक्त 15 किलो बियाणे लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. या पद्धतीने 20 क्विंटल एकरी उत्पादन घेतल्याचे सांगितले. यावेळी सोयाबीन पिकाची उगवण 100 टक्के झालेली असल्याने कृषीमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
या भेटीच्या वेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, शेतकरी उपस्थित होते. त्यापूर्वी जिल्ह्याच्या खरीप हंगामाची बैठक सातारा येथे झाली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते आणि बी- बियाणे मिळावे यासाठी शासन आग्रही असून यावर कृषी विभागाचे लक्ष आहे, असे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण प्रयोगांबाबत सकारात्मक ः भुसे
जिल्ह्यातील एक शेतकरी जिरेनियम या सुंगधी वनस्पतीची लागवड करतो याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. नैसर्गिक रंगाच्या शेतीला मोठा वाव असल्याचे महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. या दोन्ही गोष्टी नाविन्यपूर्ण असून राज्याचा कृषीमंत्री म्हणून याबाबतीत काय करता येईल याचा सकारात्मक विचार करू, असे भुसे यांनी सांगितले. यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांनी काही सूचना केल्या तर आ. महेश शिंदे यांनीही फुल शेती, हळद शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. त्यावर शासन पातळीवर योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.