‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ रद्द करून अतिरिक्त विशेष फेरी
पुणे – इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा अधिक सुसूत्रता आणण्यात येणार आहे. “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ ही फेरी रद्द करून आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेरीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
मागील काही वर्षांमध्ये अकरावी प्रवेशादरम्यान आलेले अनुभव व त्याअनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या विभागांत जुलैपासून ऑनलाइन प्रवेश पद्धती राबविण्यात येणार आहे.
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) असलेल्या आरक्षणामध्ये 16 ऐवजी 12 टक्के असा बदल करण्यात येत आहे. अपंग किंवा दिव्यांगांसाठी असलेले आरक्षण 3 वरून 4 टक्के केले आहे. द्विलक्षी अभ्यासक्रम (बायफोकल) प्रवेश हे शून्य फेरीमध्ये आयोजित करण्यात येणार नाहीत.
नियमित फेरीत समांतर प्रवेश प्रक्रिया म्हणून हे प्रवेश करण्यात येणार आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. घेतलेले प्रवेश रद्द केलेले व शाखा, महाविद्यालय बदल करू इच्छिणारे विद्यार्थी आधीचा प्रवेश रद्द करून विशेष फेरी-1 व नंतरच्या अतिरिक्त विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. पुणे व बृहन्मुंबई महापालिका यांच्याकडून चालविण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील 50 टक्के जागा इन-हाऊस कोटांतर्गत महापालिका शाळांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
यंदा डिजिटल माहिती पुस्तिका
यंदा छापिल माहिती पुस्तिका न देता डिजिटल स्वरूपात देण्यात येणार आहे. पीडीएफ बुकलेट स्वरूपात, ऑनलाइन प्रणालीवर व मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांनी पाच माहिती पुस्तिका सुलभ संदर्भासाठी उपलब्ध करून देण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनी मार्गदर्शन केंद्रावर माहिती पाच माहिती पुस्तिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
प्रवेशासंबंधी महत्त्वाचे मुद्दे
– विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया शुल्क ऑनलाइन भरावे लागणार
– ऑनलाइनद्वारे आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक
– आवश्यकतेनुसार अतिरिक्त विशेष फेऱ्यांचे आयोजन करावे लागणार
– जैसे थे अर्ज ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार