उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांचे आवाहन
पत्रकारितेतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी शनिवारी नवी दिल्लीत ‘पत्रकारितेतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार 2019′ प्रदान केले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांचे महत्त्व आणि भूमिका अधोरेखित केली. 1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिक्की यांचे “द बंगाल गॅझेट’ – हे भारतातील पहिले वृत्तपत्र सुरू झाल्यापासून वृत्तपत्रे जनतेच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत यावर त्यांनी भर दिला.
आपल्या भाषणात उपराष्ट्रपती म्हणाले कि पत्रकारांनी द्वारपालांची भूमिका पार न पाडता निष्पक्ष, वस्तुनिष्ठ, अचूक आणि संतुलित माहिती वाचक आणि दर्शकांसमोर सादर करणे हे पत्रकारितेचे मुख्य तत्व आहे. त्यांनी माध्यमांना बातम्या रंगवून न सांगता बातम्यांमध्ये वस्तुनिष्ठता, निष्पक्षपातीपणा आणि अचूकता राखण्याचे आवाहन केले. इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया स्मार्ट फोनवर मिनटागणिक बातम्या देत असताना पत्रकारांनी खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीबाबत सावधानता बाळगावी असे ते म्हणाले.
विकासाच्या बातम्या आणि कृषी सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना अधिकाधिक प्रसिद्धी देण्याचे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले. नायडू यांनी देशात जबाबदार पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यात भारतीय प्रेस कौन्सिल करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. भारताच्या उपराष्ट्रपतींनी पुरस्कार वितरण समारंभात पत्रकारिता आचार निकष -2019, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची डिरेक्टरी आणि स्मरणिका प्रकशित केली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माध्यमांना भेडसावणाऱ्या समस्या अधोरेखित केल्या. ते म्हणाले की आज पेड न्यूजपेक्षा खोट्या बातम्यांचे संकट आहे. फेक न्यूजमध्ये टीआरपी जास्त आहे आणि हे समाज आणि देशासाठी चांगले नाही. शेवटच्या वापरकर्त्यांपर्यंत योग्य बातमी पोचवण्याची आपली महत्वाची जबाबदारी माध्यमांनी समजून घ्यायला हवी, असे जावडेकर म्हणाले.