पुणे -अंध व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर नवरी आणि मध्यस्थांनी नवऱ्या मुलाची तब्बल 9 लाखांची फसवणूक केली. सात महिने संसार केल्यानंतर नवरीने घरातील दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद केसाराम चौधरी (30, विमाननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिला, कैलासकुमार सिंघवी, नंदलाल बंब आणि राजू कोठारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. फिर्यादी विनोद चौधरी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियात काम करतात. दरम्यान, त्यांच्या समाजातील मध्यस्थ कैलासकुमार सिंघवी याच्यामार्फत त्यांना संबंधित महिलेचे स्थळ आले.
मध्यस्थाने विवाहासाठी मुलीच्या कुटुंबास पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार त्यांना वेळोवेळी 8 लाख 73 हजार रुपये देण्यात आले. दरम्यान, नवरीने संसार करत असताना कपाटातील 33 हजार रुपयांचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला.
विनोद यांनी तिच्याशी वारंवार संपर्क साधला असता, तिने परत येण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर तिने फोन बंद करुन ठेवला. तिचे आधारकार्ड तपासले असता, तेही बनावट निघाले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोल्लुरे करत आहेत.