पुणे – वस्तू आणि सेवाकर रुपात अपेक्षित 1 लाख कोटी रुपये संकलनापेक्षा आता 1.30 दशलक्ष रुपयांचे जीएसटी संकलन होताना दिसत आहे, यावरून आपण आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत, हे दिसून येते. आर्थिक समावेशकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहार या तीन स्तंभांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी गुरूवारी पुण्यात केले.
महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना (एमटीपीए), अखिल भारतीय कर व्यावसायिक महासंघ (एआयएफटीपी), महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर व्यावसायिक संघटना (जीएसटीपीएएम) आणि उत्तर महाराष्ट्र कर व्यावसायिक संघटना (एनएमटीपीए) यांच्या विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेला ते उपस्थित होते.
करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नसली तरी कोविडपासून प्रतिबंधासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. अशी परिषद नियमितपणे आयोजित करणे ही आवश्यक आणि स्वागतार्ह बाब असल्याचे कराड म्हणाले.
“करदाते हे राष्ट्रनिर्माते आहेत’ असे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले होते, ते अगदी बरोबर आहे. 7 वर्षांपूर्वी 17 लाख कोटी रुपयांचा असलेला केंद्रीय अर्थसंकल्प आता दुपटीने वाढला आहे आणि प्रामाणिक करदात्यांमुळेच हे शक्य झाले.
चार वर्षांपूर्वी जेव्हा वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला, तेव्हा त्याच्या रचनेत काही त्रुटी होत्या. परंतु, हळूहळू कर व्यावसायिकांचे अभिप्राय आणि सूचनांमुळे या समस्या दूर केल्या जात आहेत. आधुनिक भारत हा आरोग्य, संपदा, पायाभूत सुविधा यांनी परिपूर्ण असेल आणि वित्त या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. याशिवाय कर संकलनात पारदर्शकता आणणारी स्वच्छ आणि स्पष्ट व्यवस्था निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे कराड यांनी नमूद केले.
यावेळी सीए योगेश इंगळे लिखित “जीएसटी शास्त्र’, स्वप्नील शाह लिखित “जीएसटी ऑन सर्व्हिस सेक्टर’ आणि सीए वैशाली खर्डे लिखित “अ प्रॅक्टिकल गाईड ऑन जीएसटी ऍक्ट’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी “क्रेडाई’चे अध्यक्ष सतीश मगर, एमटीपीएचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, “एआयएफटीपी’चे श्रीनिवास राव, एमटीपीएचे अध्यक्ष मनोज चितळीकर आदी उपस्थित होते