- स्थानिक लोकप्रतिनिधींचे होतेय दुर्लक्ष
खालापूर – खालापूर तालुक्यातील महड येथे असलेली स्वतंत्र स्मशानभूमीवरील निवारा शेडच गायब झाल्याने येथील स्मशानभूमी शेवटी घटका मोजत असल्याने येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत असून, लवकरात लवकर या स्मशानभूमीचे नूतनीकरण करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थवर्ग करीत असून, या समस्येकडे येथील लोकप्रतिनिधी गांभीर्यपूर्वक लक्ष देणार का ? असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे.
खालापूर नगरपंचायत ही विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असतानाही या नगरपंचायत हद्दीतील काही प्रभागात लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात नाराजी सूड उमटत आहे.
मुंबई-पुणे हायवे लगत महडगाव वसलेले असून, या गावातील सर्व घडामोडींकडे संपूर्ण खालापूर तालुक्याचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असते. आता पुन्हा महडगाव चर्चेचा विषय बनला असून, महडगावात एखादा घटना घडल्यास अंत्यविधी दरम्यान स्मशानभूमीवर निवारा शेडचे नसल्याने पावसाळ्यात पाऊसापासून बचाव करावा लागतो, तर उन्हाळ्यात भर उन्हामध्ये नागरिकांना थांबून अंत्यविधी करावी लागत असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
त्यामुळे संबंधित नगरपंचायतीने स्मशानभूमी न बांधून निदान शेवटच्या अंत्यविधी दरम्यान यातना सहन कराव्या लागणार नाहीत, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.