पाटणा – बिहारच्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला केवळ एकच जागा मिळाली असली तरी या निवडणुकीत आपण भाजपला मजबूत करू इच्छित होतो. हा हेतू आपण साध्य केला आहे. मला जे अपेक्षित होते तेच झाले आहे असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अन्य राजकीय पक्षांप्रमाणे आम्हीही येथे अधिकाधिक जागा जिंकण्याच्या प्रयत्नांत होतो. त्यात आम्हाला अपेक्षित यश आले नसले तरी माझे अंतिम ध्येय हे बिहार मध्ये भाजपला मजबूत करणे हेच होते. हे काम आम्ही साध्य केले त्याचे आम्हाला समाधान आहे असेही पासवान यांनी नमूद केले.
पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असला तरी बिहार मध्ये मात्र हा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढला होता. आम्ही राष्ट्रीय पातळीवर भाजपबरोबर असलो तरी बिहार मध्ये मात्र आम्ही नितीशकुमार यांच्या विरोधात आहोत आणि त्यांना घरी बसवणे हाच आमचा उद्देश आहे अशी भूमिका चिराग पासवान यांनी या निवडणूक प्रचारात सातत्याने मांडली होती. परंतु तरीही चिराग पासवान यांना भाजप नेत्यांनी रोखण्याचे काम केले नाही असा आरोपही भाजपवर केला जात आहे.