कोल्हापूर (प्रतिनिधी) – अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे यावर्षी प्रथमच जंगलाला देखील झळ पोहचली आहे. दाजीपूर परिसरात सरासरीच्या दुपट्ट पाऊस झाल्याने जंगलात अनेक ठिकाणी रस्ता, छोट्या ओढ्यांवरील पूल (मोरी) वाहून गेले आहेत. यामुळे दरवर्षी 1 नोंव्हेबरला पर्यटकांसाठी खुले होणारे जंगल मार्ग यावेळी 1 डिसेंबरला सुरु होणार आहे.
यावर्षीचा वैशिष्ट्य म्हणजे खरंच या पावसामुळे जंगलात नक्की काय बदल झाला, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जंगल भागात हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे सकाळी कोवळ्या उनःप्रकाशात अनेक प्रकारचे साप या काळात दिसतात. फुलपाखरांचे थवेच्या थवेही दिसू शकतात. वेगवेगळे पक्षीवैभव यावेळी आपले लक्ष वेधून घेतात.
या थंडीच्या दिवसात अभयारण्यात प्राणी दर्शन होण्याची शक्यता खूप कमी असते. पण सकाळी कोवळ्या उन्हात राधनगरीच्या जैवविविधतेचे प्रतीक गवा रेडा कळपाने दिसू शकतात. वन्यजीव विभाग व स्थानिक समितीने सर्व रस्ते लवकरात लवकर पूर्ण करून पर्यटकांची जास्तीत जास्त सोय करण्याच्या प्रयत्न केला आहे. तसेच पर्यटकांनी कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक आत नेण्यास बंदी करण्यात आली आहे.