भाजपचे सरचिटणीस राम माधव यांचे प्रतिपादन
वडोदरा – दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेला हल्ला हा डाव्या विचारांच्याच विद्यार्थी संघटनांनी घडवलेला दहशतवादी स्वरूपाचा हल्ला आहे असा आरोप भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी केला आहे. या डाव्या दहशतवाद्यांनी गेले अनेक दशके तेथे अशा स्वरूपाची कृत्ये करून तेथील शिक्षण प्रक्रियेतच खंड पाडण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोपही त्यांनी केला. 5 जानेवारीला विद्यापीठाच्या आवारात झालेला हल्ला हा डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आणि त्यांच्या समर्थकांचेच कटकारस्थान होते असेही त्यांनी म्हटले आहे.
5 जानेवारीला तोंडावर बुरखा घालून आलेल्या सुमारे 50 जणांच्या जमावाने तेथे मोठ्या प्रमाणात मोडतोड करीत हल्ला केला होता. त्या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे आणि या घटनेच्या विरोधात देशभर मोर्चे काढले जात आहेत. या हिंसाचाराबद्दल डाव्या संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित अभाविप यांनी एकमेकांना दोषी ठरवले आहे. त्या अनुषंगाने बोलताना राम माधव यांनी वरील प्रतिपादन केले.
पत्रकारांनी त्यांना आज जम्मू काश्मीरातील स्थिती बाबत विचारले असता ते म्हणाले की तेथे आता सगळी परिस्थिती सुरळीत होत आहे. मोठ्या प्रमाणात तेथे आता इंटरनेट सेवाही सुरू होत आहे असे ते म्हणाले. अनेक स्थानबद्धांची सुटका केली जात आहे. आता तेथे केवळ 20-25 नेते स्थानबद्ध आहेत. त्यांचीही टप्प्याटप्प्याने सुटका केली जात आहे.जम्मू काश्मीर हे आता भारताच्या अन्य सामान्य प्रदेशा प्रमाणेच एक राज्य असल्याने त्याविषयी आता वेगळी चर्चा करण्याचीही गरज नाही असेहीं त्यांनी यावेळी नमूद केले. तेथील स्थितीनुसार प्रत्येकाला त्या राज्यात प्रवेशाची अनुमती दिली जाईल असे ते म्हणाले. घटनेचे 370 कलम रद्द केल्याबद्दल तसेच सीएए कायदा लागू केल्याबद्दल देशातील 90 टक्के जनता मोदींच्या पाठीशी उभी राहिली असल्याचे प्रतिपादनही राम माधव यांनी यावेळी केले.