मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण
मुंबई : मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी नुकतीच विधान परिषदेत केली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. याच चर्चांना आता खुद्द मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी पुर्णविराम दिला आहे. सरकारसमोर अद्याप मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आलेला नाही. त्यामुळे कोणीही त्यावर कोणत्याही प्रकारची आदळआपट करण्याची गरज नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुस्लिम आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सरकारसमोर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आला नाही. त्याबाबत कोणतीही आदळआपट करण्याची गरज नाही. मुद्दा सरकारसमोर आल्यावर कागदपत्र तपासून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. शिवसेनेने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबतही वक्तव्य केले. मराठा आरक्षणावर सरकार ताकदीने लढत असल्याचे ते म्हणाले.
एनपीआरसाठी तीन पक्षांसह मित्रपक्षांच्या सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. एनपीआरमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे तपासून ही समिती तपासून पाहणार आहे. कोणत्याही नागरिकाचा अधिकार हिरावून घेऊ देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.