आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा होकार
सातारा – लावंघर खोऱ्यातील गावांना उरमोडी धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यासंदर्भात जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी महत्वकांक्षी लावंघर उपसा सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी ना. पाटील यांच्याकडे केली.
या योजनेला मान्यता देतानाच निधी उपलब्धतेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही तातडीने करावी, अशा सुचना ना. पाटील यांनी बैठकीत दिल्या.
लावंघर उपसा सिंचन योजनेसंदर्भात ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. उरमोडी धरणातून सातारा तालुक्यात बंदीस्त पाईपलाईनने पाणी जाणार असल्याने 25 टक्के पाणी बचत होणार आहे. शासनाच्या धोरणानुसार त्या 25 टक्के
पाण्याचा उपयोग लावंघर खोऱ्यातील गावांना सिंचनासाठी व्हावा.
यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सुचनेनुसार पाटबंधारे विभागाने योजनेबाबतचा सर्व्हेही केला आहे. दरम्यान, यासंदर्भात ना. पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लावंघर उपसा सिंचन योजना मार्गी लागल्यास लावंघर, शिंदेघर, सायळी, चिकणेवाडी, करंजे तर्फ परळी, सावंतवाडी, शिंदेघर, काळोशी, मस्करवाडी, कुरुण, आंबवडे बुद्रुक आणि परिसरातील गावातील जमीन ओलीताखाली येईल, या भागाचा पाणीप्रश्न मिटेल. त्यामुळे ही योजना मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
बैठकीत भूसंपादन, पाण्याची आवश्यकता व बचत, न्यायालयीन अडीअडचणी आणि योजनेत समाविष्ट गावे आदींबाबत सविस्तर चर्चा झाली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. पाटील यांनी या योजनेला मंजुरी दिली असून संकल्पन व अंदाजपत्रकाबाबत पुढील कार्यवाही तातडीने करण्याच्या सुचना ना. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. गेल्या अनेक वर्षांपासून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लावंघर उपसा सिंचन योजनेसाठी अभ्यासपूर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता. या योजनेला मंजुरी मिळाल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून लावंघर उपसा सिंचन योजनेत समाविष्ट गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.