25/15 योजनेतून चाळीस गावे वंचित; पाणी पुरवठा अधिकारीच जबाबदार
कराड – 25/15 इतर ग्रामविकास कार्यक्रम योजनेस शासनास स्टे देण्यात आला आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील चाळीस गावांचे सुमारे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे. याच सर्वस्वी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुनील आडके हेच जबाबदार असल्याचा आरोप सभापती, उपसभापती व सदस्यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केला.
अध्यक्षस्थानी सभापती प्रणव ताटे होते तर उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, बांधकाम, लघु पाटबंधारे, शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केले. पाणी पुरवठा विभागाचा अहवाल देण्यासाठी आलेल्या अभियंता सुनील आडके यांना सर्वच सदस्यांनी धारेवर धरले. पहिल्या बैठकीला प्रश्न विचारले की दुसऱ्या बैठकीस रजेवर राहणे हे नेहमीचेच झाले आहे. काम कमी आणि रजा जास्त असे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचे काम आहे. तालुक्यात अनेक पाणीपुरवठ्याचे प्रश्न आहेत. आता उन्हाळा सुरू असल्याने पाणी टंचाईचे नियोजन नाही. अशा कार्यशून्य अधिकाऱ्यांची प्रत्येक कामाचा अहवाल तपासून जिल्हा परिषदेकडे सादर करावा. तसेच 25 बार 15 योजनेस मिळालेल्या स्टे मध्ये ते जर दोषी सापडत असतील तर तसा अहवाल जिल्हा परिषदेस सादर करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना उपसभापती रमेश देशमुख यांनी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांना केल्या.
महावितरणच्या अधिकाऱ्यांची चार महिन्यानंतर बैठकीस उपस्थिती दिसल्याने सर्व सदस्यांनी आपापल्या भागातील अडचणी त्यांना सांगण्यास सुरुवात केली. यात अंगणवाडीला पब्लिक सर्व्हिस दर्जाचे बील द्या, बनवडी फाटा ते एसजीएम महाविद्यालयापर्यंतच्या अंधारात बुडालेल्या रस्त्यावर रात्री पथदिवे लावा, ओंड येथे ऐन रस्त्यात असणारा पोल हलवा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या गावातील पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी पत्र लवकरात लवकर द्यावे असे सांगितले.
त्यानंतर शिक्षण विभागाचा आढावा देताना स्वच्छ शाळा सुंदर शाळा परिक्षण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. तसेच व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत कराड तालुका प्रथम आला असल्याचे सांगितल्यानंतर सदस्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर 8 मार्च ते 11 मार्च दरम्यान होणाऱ्या शिक्षण महोत्सवाबाबत माहिती देण्यात आली तसेच या कार्यक्रमास सर्व तालुकावासीयांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात आले.
शिक्षण महोत्सवास 8 मार्चपासून प्रारंभ
शिक्षण विभागाचा आढावा देताना गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी येत्या आठ मार्चपासून शिक्षण महोत्सवास प्रारंभ होत असल्याची माहिती दिली. यावर्षी हा महोत्सव चार दिवसांचा असून त्यामध्ये विविध कार्यक्रमांची पर्वणी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी तसेच सर्व सदस्यांनी आवर्जून कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन केले.
शिवाय कराड पंचायत समितीच्या शिक्षण महोत्सवाची दिवसेंदिवस उंची वाढत असून या महोत्सवाचा इतर तालुक्यांनी आदर्श घ्यावा, अशा सूचना जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या असल्याबाबबतची माहिती सदस्यांना दिली.