लंडन – स्मृती मानधनाच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीनंतरही भारताच्या महिला संघाला तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडकडून 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात भारताला प्रतिष्ठा राखता आली नाही. एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिकाही भारताने गमावली. गुरूवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून 8 गडी राखून पराभवा स्वीकारावा लागला.
इंग्लंडकडून सलामीवीर डॅनी वायटने एकहाती खेळी करत विजय साकार केला.भारताकडून सलामीवीर स्मृतिने 70 धावांची खेळी केल्यामुळे भारताने 153 धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले.
इंग्लंडकडून डॅनी वायटने 89 धावांची आक्रमक खेळी करत भारताच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. तिने 19 व्या षटकांतच संघाचा विजय नोंदवला. स्मृतीचा अपवाद वगळता कर्णधार हरमनप्रीत कौर (36) आणि रिचा घोष (20) यांनीच थोडीफार चमक दाखवली.
भारताकडून स्मृतीने 51 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. मात्र, इंग्लंडकडूनही वायटने 56 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकार फटकावताना 89 धावांची खेळी केली व सामनावीराचाही मान मिळवला.