पुणे – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आळंदी, पुणे यांच्या वतीने पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद गुरुवार 15 जुलै ते रविवार 18 जुलै 2021 या कालावधीत ऑनलाइन आयोजित करण्यात आली आहे.
मानवी जीवनामध्ये संत वाड्मयाचे अत्यंत मोलाचे स्थान आहे. कालानुरूप बदलणाऱ्या शिक्षणपद्धतीनुसार अभ्यासक्रमातही अमूलाग्र बदल झाले. म्हणून आजच्या शिक्षणपद्धतीमध्ये संत साहित्याचा सहभाग किती महत्वाचा आहे या विषयावर शिक्षणतज्ञ, आध्यात्मिक गुरू, कीर्तनकार, शिक्षण तसेच सांस्कृतिक खात्याचा पदभार सांभाळणारे लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन या परिषदेत लाभणार आहे.
आज 15 जुलै रोजी दोन वाजता या परिषदेचे उद्घाटन झाले. सहा सत्रांमध्ये ही परिषद होणार आहे. पहिल्या सत्राचा विषय – संत साहित्य – समृद्ध जीवन जगण्याचे आधुनिक शास्त्र, दुसऱ्या सत्राचा विषय – वारकरी संप्रदाय -आधुनिक की कालबाह्य ?, तिसऱ्या सत्राचा विषय – संत साहित्य समृद्ध जीवन जगण्याचे आधुनिक शास्त्र, चौथ्या सत्राचा विषय – संत आणि आरोग्य व्यवस्थापन, पाचव्या सत्राचा विषय – आमच्या तत्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले ?, सहाव्या सत्राचा विषय – भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का? हे विषय असणार आहेत.
परिषदेत नामवंत शिक्षण तज्ज्ञ, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक आपले विचार मांडतील. या पहिल्या भारतीय संत साहित्य उच्चशिक्षण परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब मोरे आणि कीर्तनकार व प्रवचनकार रविदास महाराज शिरसाठ हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
अधिक माहिती आणि विनामुल्य नोंदणीसाठी – saintsineducation.org \ santsahityashikshan.org या संकेतस्थळाला भेट द्या