जुन्नर (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यातील विविध भागांमध्ये मंगळवारी (दि. १८) तब्बल ४५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हा आजपर्यंतचा सर्वाधिक आकडा असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेणे आता अत्यावश्यक बनल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी सांगितले आहे.
नव्याने आढळून आलेल्या ४५ रुग्णांपैकी नारायणगाव परिसरात तब्बल १३ तर जुन्नर शहर व सावरगाव येथे प्रत्येकी ५ व्यक्ती आढळून आल्या आहेत. तर ओतूरला चार, रोहकडी येथे तीन आणि खामगाव, निमगाव व बेल्हे येथे प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत.
वडज, अमरापूर, बारव, येणेरे, बेलसर, शिंदे, काळवाडी, आळे व उंब्रज येथे प्रत्येकी एक बाधित व्यक्ती आढळून आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण बधितांचा आकडा ६५१ झाला आहे.
या बाधितांपैकी ४७५ व्यक्ती उपचारानंतर घरी परतले आहेत तर उर्वरित १४८ ॲक्टिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान बेलसर येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यातील एकूण मृतांचा आकडा २८ झाला आहे.
जुन्नरकरांची जबाबदारी आणखीन वाढली
गेल्या पंधरा दिवसांपासून शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये काहीशी शिथिलता दिल्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिकच वाढल्याचे लेण्याद्री सेंटरचे प्रमुख डॉ. शाम बनकर यांनी सांगितले आहे. तालुक्यात करोनामुळे मृत झालेल्या २८ व्यक्तींपैकी बहुतांश व्यक्ती ५०-५५ वयोगटाच्या पुढील असून त्यांना इतरही आजार असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे घरातील जी तरूण व्यक्ती बाहेर फिरत असते तिने घरात आल्यावर वयस्कर व्यक्तींपासून दूर रहावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी केले आहे. तसेच घरातील वयस्कर व इतर आजार असलेल्या व्यक्तींना घरातच वेगळ्या खोलीत क्वारंटाईन केल्यास वयस्कर व्यक्तींमधील वाढती बधितांची संख्या कमी होणार असल्याचे डॉ. गोडे यांनी सांगितले.
तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना सर्वांनी मास्क व सॅनेटायझरचा वापर कटाक्षाने करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.