नवी दिल्ली – केंद्रिय सांस्कृतिक मंत्रालयाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये सुमारे 2.5 कोटी राष्ट्रध्वज विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. वाढत्या लोकसहभागामुळे ही मोहीम आता एक मोठी लोकचळवळ बनली आहे. केंद्रीय सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन म्हणाले की, या मोहिमेबद्दल देशात खूप उत्साह आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा या योजनेची सुरुवात झाली, तेव्हापासून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
वर्ष 2023 मध्ये “हर घर तिरंगा’ मोहीम गेल्या वर्षी त्याच प्रमाणात आणि वचनबद्धतेने साजरी करण्याचे सरकारचे ध्येय आहे. मागील वर्षी केलेली सर्व तयारी या वर्षीही पूर्ण झाली आहे. केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ध्वजांचा पुरवठा करण्यात आला आहे. यावर्षी सुमारे अडीच कोटी ध्वज पोस्ट ऑफिसला पुरवण्यात आले आहेत, तर गेल्या वर्षी हा आकडा एक कोटी होता.
या उपक्रमांतर्गत, पोस्ट विभाग उच्च दर्जाचे आणि भारतीय ध्वजसंहितेला अनुसरुन असलेले राष्ट्रध्वज लोकांना विकण्यासाठी एक जबाबदार संस्था म्हणून काम करत आहे. टपाल विभागाकडे 5.5 दशलक्ष ध्वज आधीच पाठवले गेले आहेत. अनेक राज्यांमध्ये विविध स्वयं-सहायता गटांद्वारे एक कोटी ध्वज तयार केले जात आहेत. अनेक कुटुंबे या मोहिमेचा भाग म्हणून मागील वर्षी खरेदी केलेले ध्वज पुन्हा वापरणार आहेत.
राज्यांचे मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होतील, असे गृहित धरण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी गुजरातचे मुख्यमंत्री साबरमती रिव्हरफ्रंट येथून सुरू होणाऱ्या तिरंगा यात्रेचे नेतृत्व करतील. याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री तिरंगा यात्रेत सहभागी होणार आहेत.
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सार्वजनिक ठिकाणे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या कार्यक्रमांसह ‘प्रभातफेरी’ आणि ‘तिरंगा यात्रा’ आयोजित केली जाणार आहे. या वर्षी आतापर्यंत संस्कृती मंत्रालयाने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह 2,000 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
भारतात सुमारे 26 कोटी कुटुंबे आहेत आणि जवळजवळ सर्वच जण आपल्या आवारात ध्वज फडकवतात. गेल्या वर्षी ‘हर घर तिरंगा’ वेबसाइटवर भारतीय ध्वजासह सुमारे सहा कोटी सेल्फी अपलोड करण्यात आले होते. यावेळी हा आकडा वाढेल अशी सरकारला आशा आहे.