नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. यानंतर ते ऐतिहासिक वास्तूच्या तटबंदीवरून राष्ट्राला पारंपरिक भाषण देतील. गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात 12 मार्च 2021 रोजी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात समाप्त होईल.
वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा एकदा देशाला नव्या उमेदीने ‘अमृत काल’कडे नेले जाईल. यावेळी 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या संख्येने पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील सुमारे 1,800 लोकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सरकारच्या ‘जनभागीदारी’चा एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
यामध्ये 660 हून अधिक गावांतील 400 हून अधिक सरपंचांचा समावेश आहे. शेतकरी उत्पादक संस्था योजनेतून 250 शेतकरी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेतील प्रत्येकी 50 सदस्य, नवीन संसद भवनासह सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील 50 बांधकाम कामगार, खादी कामगार, सीमा रस्ते, अमृत सरोवर आणि हर घर जल योजनेच्या बांधकामाशी संबंधित लोक, तसेच प्राथमिक शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमारांना अशा घटकांतील प्रत्येकी 50 जणांना नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
यापैकी काही खास पाहुणे राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत आणि दिल्लीतील मुक्कामादरम्यान संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांची भेट घेणार आहेत. तसेच प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 75 जोडप्यांना त्यांच्या पारंपारिक पोशाखात लाल किल्ल्यावर समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
दिल्लीत 12 महत्त्वाच्या ठिकाणी सरकारने एनएचबीच्या विविध योजना आणि उपक्रमांसाठी सेल्फी पॉइंट्स स्थापन करण्यात आले आहेत. या योजना/उपक्रमांमध्ये ग्लोबल होप, लस आणि योग, उज्ज्वला योजना, स्पेस पॉवर; डिजिटल इंडिया, स्किल इंडिया; स्टार्ट-अप इंडिया; स्वच्छ भारत; सशक्त भारत, नवा भारत; एम्पॉवरिंग इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन मिशन यांचा समावेश आहे.
पंतप्रधानांच्या गार्ड ऑफ ऑनरची कमान मेजर विकास सांगवान यांच्याकडे असेल. लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व मेजर इंद्रजित सचिन, नौदल तुकडी लेफ्टनंट कमांडर एमव्ही राहुल रमन आणि हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर आकाश गंगास करणार आहेत. अतिरिक्त डीसीपी संध्या स्वामी दिल्ली पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहेत.