मंचर- कळंब, चांडोली (ता. आंबेगाव) परिसरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. कळंब परिसर हा द्राक्ष बागांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. परंतु, सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष पीक धोक्यात आल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले.
कळंब परिसरात जम्बो, नाना पर्पल, शरद अशा विविध प्रकारच्या द्राक्षाच्या जाती आढळतात. बहुतांशी शेतकऱ्यांच्या पाच एकरपेक्षा अधिक द्राक्षाच्या बागा आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, दिलीप वऱ्हाडी, अनिल कानडे, उद्योजक विष्णू कानडे, अर्जुन कानडे, निलेश कानडे, प्रविण थोरात, विनोद थोरात, जयवंत थोरात, तुषार कानडे, तुषार थोरात, अविनाश थोरात, मयूर वाव्हळ, अजित भालेराव, रवींद्र कानडे, नवनाथ कानडे, विलास भालेराव, प्रमोद पंधे या शेतकऱ्यांच्या शेकडो एकर द्राक्षांच्या बागा कळंब चांडोली परिसरात आहेत.
सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष पिकावर बुरशीजन्य रोग पडू लागला आहे. काही ठिकाणी डाऊनी सदृश्य बागा होऊ लागल्या असल्याने दररोज औषध फवारणी करावी लागत आहे. शेतकरी देवाकडे पाऊस थांबावा व द्राक्ष पिकाची वाढ उत्तम व्हावी, यासाठी प्रार्थना करु लागले आहेत. पावसामुळे औषधांचा हजारो रुपये खर्च वाया गेला आहे.