वाघोली (पुणे) – हवेली तालुक्यातील बिवरी ग्रामपंचायत 42 वर्षानंतर बिनविरोध झाली आहे. 42 वर्षांचा पायंडा मोडून काढला आहे. विशेष म्हणजे या गावाने कधी बिनविरोध असा विषय सुद्धा कधी घेतला नाही, पण यंदा प्रथमच ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावचा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बिनविरोध निवडणूक जाहीर केली.
यामध्ये ग्रामस्थांच्या एकमताने अमित जालींदर गोते, उत्कर्षा नितीन गोते, प्रियंका विशाल गायकवाड, पोपट रामचंद्र गोते, कविता जालिंदर गोते, जितेश भगवंत गोते, शुभांगी संदीप गोते या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील ग्रामस्थांनी एकत्रीत येत निर्णय घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये गाव, गोते मळा, वाडी, वस्ती, व इतर या सर्व चांगल्या थोर विचारांची मंडळींनी नाथसाहेबाच्या मंदिरात बैठक आयोजित केली. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरवातीला गावाच्या विकासासाठी सर्वात पहिल्यांदा सदस्यपदासाठी सर्वात जास्त उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु त्यांनीदेखील गावच्या विकासासाठी योगदान देत अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. गावातील सामाजिक सलोखा खऱ्या अर्थाने आगामी काळात विविध विकासकामांच्या उभारणीसाठी हा निर्णय उपयोगी पडेल, असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
- बिवरीकरांच्या निर्णयाचे जिल्हाभर कौतुक
गाव तसं चांगलं पण मंदिरासाठी निवडणूक बिनविरोध करून गेलं, अशी चर्चा सध्या बिवरी गावात रंगू लागली आहे. ग्रामस्थांच्या पाठबळावर गावात तालुक्यात सर्वात मोठे एक मंदिर उभारण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे. यासाठी संपूर्ण गाव व चांगल्या विचारांची मंडळी एकत्र येत आहे. गावातील मंदिराच्या उभारणीसाठी ग्रामस्थांनी उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण असल्यामुळे या निर्णयाचे जिल्हाभर कौतुक होत आहे