रत्नागिरी – आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय 31 डिसेंबरआधी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असे शिवसेना उ. बा. ठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. साल 2024 मध्ये राज्यात नवीन सरकार येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यासाठी ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.
गुरुवारपासून दोन दिवस म्हणजेच, 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ते रायगड जिल्ह्यातील नागोठणे या दरम्यान दौरा करणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांसोबत खळा बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत हा दौरा असला तरी आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने देखील आदित्य ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.