लाखणगाव (पुणे) – आंबेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. सरकार आपल्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात शनिवारी (दि. 19) झालेल्या मुसळधार पावसाने व ढगफुटीमुळे अवसरी बुद्रुक, लाखणगाव व पोंदेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीसह मातीही वाहून गेली. गेल्या 40 ते 45 वर्षांत अशा प्रकारचा मुसळधार पाऊस पहिला नसल्याचे इथले स्थानिक नागरिक सांगतात. या गंभीर नुकसानीची माहिती मिळताच आढळराव पाटील यांनी तात्काळ या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. अवसरी बुद्रुक येथील एका वस्तीवर जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेलय छोट्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून यापूर्वीदेखील 2 ते 3 वेळा हा पूल वाहून गेल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.
आढळराव पाटील म्हणाले की, एकीकडे करोनाचा सामना करीत असताना या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर खालावला आहे. शेतीच्या कामांसाठी कर्जे काढून लागवड केलेली शेतीभुईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक आधार मिळावा यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, उपतालुकाप्रमुख अजित चव्हाण, किसान टाव्हरे, टाव्हरेवाडीचे माजी सरपंच मार्तंड टाव्हरे, लाखणगावचे माजी सरपंच महादेव कानसकर, पोंदेवाडीचे माजी सरपंच बबनराव वाळुंज, रवी वळसे, कल्याण हिंगे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.