कोरेगाव (प्रतिनिधी)- रेल्वेखाली जीव देऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुसेगाव येथील युवकाला कोरेगाव पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे जीवदान मिळाले. हवालदार अमोल धनावडे व सतीश कर्णे यांनी धावत्या सह्याद्री एक्सप्रेससमोर पळत जाऊन या युवकाला वाचविले.
रेल्वे रुळावरून धावता येत नसल्याने त्यांनी आपला चामडी बूट चक्क बाजूला काढून फेकले आणि अनवाणी खडीवरुन पळत सुटले. त्यांच्या या कार्याची दखल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घेतली असून साताऱ्यात त्यांचा विशेष गौरव केला आहे.
पोलीस ठाण्यात एक महिला बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास रडत रडत आली. माझा भाऊ आत्महत्या करण्यासाठी कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला आहे, असे तिने तेथील ठाणे अंमलदारांना सांगितले.
त्याला वाचवा अशी आर्त विनंती तिने केली. तिची केविलवाणी अवस्था पाहून राखीव ठाणे अंमलदार असलेले हवालदार अमोल धनावडे व अंमलदार सतीश कर्णे यांनी तातडीने मोटरसायकलवरून रेल्वे स्टेशन गाठले. सुरुवातीला रहिमतपूर बाजूच्या रेल्वे रुळावरून ते अर्धा ते एक किलोमीटर अंतर शोधत गेले. कुठेही तो युवक न दिसल्याने त्यांनी सातारा बाजूच्या रेल्वे रुळावर शोध मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्याच दरम्यान सातारा बाजूने कोल्हापूरकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसचा हॉर्न त्यांना ऐकू आला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब सातारा बाजूच्या रेल्वे रुळावरून धाव घेतली. कोरेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असल्याने सह्याद्री एक्सप्रेसचा वेग थोडा कमी होता. रेल्वे इंजिनाच्या लाईटच्या उजेडात युवक रुळावर बसल्याचे पोलिसांना दिसून आले.
त्यांनी रेल्वे इंजिनपासून अवघ्या पंधरा फूट अंतरावर असलेल्या युवकाला जीवाची बाजी लावून बाजूला ओढले. युवक खाली पडताच रेल्वे पुढे निघून गेली. या संपूर्ण प्रकारामध्ये हवालदार अमोल धनावडे व सतीश कर्णे यांच्या पायाला मात्र चांगलीच दुखापत झाली. अमोल धनावडे यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना रात्रीच हा प्रकार सांगितला.
आपल्या कर्मचाऱ्यांनी एका युवकाचा प्राण वाचवल्याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिली. समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी आपल्या दालनामध्ये हवालदार अमोल धनावडे व सतीश कर्णे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत गौरव केला.
यावेळी त्यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बक्षीस देखील जाहीर केले. कोरेगाव पोलिसांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आत्महत्या करण्यास निघालेल्या युवकाला जीवनदान दिले. त्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली. या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.