-मेघश्री दळवी
गेले काही महिने आपण करोनाच्या छायेत आहोत. एकीकडे यापुढे करोनासोबत जगायचं आहे, अशी मनाची तयारी होते आहे. तर दुसरीकडे संशोधक आपलं काम निष्ठेने करत आहेत. थोडा वेळ लागला तरी योग्य दर्जाची आणि सुरक्षित लस तयार करणं हे त्यांचं लक्ष्य आहे.
लस उपलब्ध झाली की त्यापुढचा टप्पा आहे, ही लस जगातील पावणेआठ अब्ज लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा. हा टप्पा उसाहवर्धक असला, तरी तो तितकाच आव्हानाचा आहे. एखादी गोष्ट संपूर्ण जगात लवकरात लवकर पोहोचवणे हे काम मानवजातीच्या इतिहासात आजवर कोणी केलं नसेल. युद्ध आणि आकस्मिक संकटांच्या काळात अनेक कामं तातडीने पार पाडावी लागतात. पण त्यांची व्याप्ती मर्यादित असते. जगातल्या प्रत्येकापर्यंत लस नेणं हे मिशन मात्र अभूतपूर्व असणार आहे, आणि त्याची तयारी आता सुरू झालेली आहे.
लसीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे यातलं पहिलं आव्हान. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी त्यासाठी आपल्या कारखान्यांमध्ये तरतूद केली आहे आणि गरजेनुसार इतर कारखान्यांची मदत घेण्याचं निश्चित केलं आहे. निर्माण झाल्यावर शक्य तितक्या वेगाने लस वितरित करावी लागते. त्यासाठी विशिष्ट तापमान राखणारी गोदामं आणि वाहतूक व्यवस्था लागतात. या कोल्ड सप्लाय चेनसाठी वेगळी कायदेशीर नियमावली असते. त्यानुसार प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसोबत पूर्ण प्रवासाचं ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग यांची अत्याधुनिक संगणक यंत्रणा असावी लागते. या पायाभूत सुविधा उभ्या करणं हे वेळखाऊ आणि जिकिरीचं काम असलं तरी आता त्याने वेग घेतलेला आहे.
त्यातलाच एक भाग म्हणून लस घेऊन जाणारी आठ हजार विमानं उपलब्ध करण्यासाठी आता सगळ्या मालवाहतूक विमान कंपन्या एकत्र आल्या आहेत. अशा विमानांना तत्काळ लॅंडिंग आणि झटपट कस्टम सोपस्कार मिळणार आहेत. तरीही लसीचे साठे भरणे, काळजीपूर्वक वाहून नेणे, उतरवणे, तिथून योग्य त्या स्थळी पोहोचवणे आणि एका मध्यवर्ती यंत्रणेतून या सगळ्याची देखरेख करणे हे खूपच मोठं तांत्रिक आव्हान आहे.
करोनावरची लस निर्माण करण्यात कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. काही ठिकाणी देशादेशांमध्ये सहकार्याने काम सुरू आहे, तर काही बाबतीत दोन देशांमध्ये वाद आहेत. लस कोणाला आधी द्यावी हाही कळीचा मुद्दा आहे.
ज्यांना रोगाचा धोका मोठा अशा व्यक्तींना पहिल्यांदा लस दिली जाईल, अशी अपेक्षा आहे. पण त्याचसोबत काही जण आपल्यालाच लस आधी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, लस खराब होऊ नये म्हणून जसे सुरक्षेचे उपाय आवश्यक आहेत, तसेच गैरप्रकार टाळण्यासाठीही कडक सुरक्षेची गरज आहे. त्यामुळे त्यात अत्याधुनिक डिजिटल तंत्राचा वापर होणार आहे.
विज्ञानाच्या मदतीने लस तयार करणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ती सर्वांपर्यंत नेणे असं हे लस पोहोचवण्याचं थरारक मिशन होणार आहे.