बिजींग: पुर्व लडाख मधील गलवान खोरे आमचेच आहे असा दावा बुधवारी चीनने अधिकृतपणे केला आहे. भारत आणि चीन यांच्या सैन्यात काल हिंसक संघर्ष झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हा दावा केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की दोन्ही लष्करातील जवान या संघर्षात बळी पडले आहेत. पण चिनी लष्कराचे नेमके किती जवान यात ठार झाले याची माहिती मात्र चीनच्या विदेश मंत्रालयाने दिलेली नाही. दोन्ही देशांतील वरीष्ठ लष्करी पातळीवरील चर्चेला या आधीच प्रारंभ झाला असता तर हा संघर्ष टाळता आला असता असेहीं त्यांनी म्हटले आहे.
या संघर्षात चीनचे 43 जवान ठार झाले आहेत असा दावा केला जात आहे त्या विषयी पत्रकारांनी चीनच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते झाओ लिज्जन यांना विचारले असता त्यांनी त्यावर काहींही भाष्य करण्यास नकार दिला. सीमेवरील आमचे लष्कर या स्थितीचा यशस्वी मुकाबला करीत आहे असे भाष्य त्यांनी केले.