जेजुरी, (वार्ताहर)- जेजुरी नगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ नियोजनात सुधारणा करावी. येत्या दोन दिवसांमध्ये शहराच्या सर्व प्रभागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा करावा. शक्य असेल तेथे टँकरद्वारा पिण्याचे पाणी पुरवावे. यामध्ये चालढकल झाल्यास नगरपालिकेला टाळे ठोको, हंडा मोर्चा, अशी आंदोलने करीत येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर सर्व ग्रामस्थ बहिष्कार टाकतील. त्याला सर्वस्वी जबाबदार पालिका प्रशासन व्यवस्था असेल, असा इशारा सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व महिलांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदा पुरंदरच्या पट्ट्यात विशेषतः नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने नाझरे (मल्हारसागर) जलाशय हे दोन महिन्यांपासून कोरडा पडला आहे,
शहराला वीर धरणाच्या मांडकी डोहातून पाणी उचलावे लागत आहे. जेजुरीच्या पाणीपुरवठा पंपापासून मांडकी डोह २३ किलोमीटर अंतरावर असला तरी यंदा दुष्काळ, उन्हाळ्याची तीव्रता, जत्रा, यात्रा उत्सव पाहता प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते. कार्यवाही नसल्याने शहरवासीयांना “पाण्यासाठी दाहीदिशा” करण्याची वेळ आली आहे.
तीव्र पाणीबाणीचा सामना करणा-या शहरवासीयांचा अखेर संयमाचा बांध फुटला. सोमवारी (दि.१) महिलांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालय गाठले. यावेळी मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्यासमवेत पाणीटंचाईबाबत चर्चा करीत निवेदन दिले.
यावेळी मनसे तालुकाप्रमुख उमेश जगताप, संभाजी ब्रिगेडचे संदीप जगताप, शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे, किरण दावलकर, माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख, रसिक जोशी, विक्रम शिंदे, अशोक खोमणे, शिवाजी जगताप, तुषार कुंभारकर, पत्रकार निलेश जगताप, प्रकाश खाडे, प्रसाद अत्रे, महेश म्हेत्रे, तानाजी जगताप, अनिकेत हरपळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जेजुरीनगरीला नेतृत्वाचा अभाव
गेली दोन वर्षांपासून नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासकीय कालावधी सुरू आहे. शहरात नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाणीपुरवठा नियोजन विस्कळीत आहे. स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, अडचणी, समस्या घेऊन जायचे कोणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. मुख्याधिकारी आहेत. परंतु ते निवासी नसतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये देवदर्शनासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी शहरात असते. प्रशासनातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे, अशा अनेक तक्रारी नागरिक करतात.