निमसाखर -जलसंपदा खात्याच्या नीरा डाव्या कालव्याच्या 54 फाट्यावरील आवर्तन पूर्ण न होता बंद केल्यामुळे निमसाखर व परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहे. यामुळे काही अधिकाऱ्यांच्या मलिदा प्रवृत्ती व कुचकामी धोरणामुळे या भागातील पिकांना मोठा फटका बसला आहे, यासाठी लवकरच न्यायलयात दाद मागणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
सध्या सूर्य आग ओकत आहे, त्यातच शेतामध्ये उन्हाळी हंगामातील कडवळ, बाजरी, भुईमूग, ऊससह अन्य घेतलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहे. या भीषण परिस्थितीत आवर्तनला उशीर त्यात सुरुवातीच्या काळात कमी क्षमतेने सुरू असलेले आवर्तन पाच दिवसांपूर्वी अचानक बंद करण्यात आले. हे आवर्तन बंद करण्याचा निर्णय कोणाचा, असा प्रश्न या भागातील 100 टक्के पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे. 54 फाट्याच्या बाबतीत वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या चुकीबाबत भागातील शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती यशवंत सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे व अन्य शेतकऱ्यांनी दिली.