सातारा – आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेतून प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड गेल्या दोन महिन्यापूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर तालुकास्तरावरील पुरस्कारप्राप्त 11 गावांमधून जिल्हा सुंदर गाव म्हणून एका गावाची निवड केली जाणार आहे. या योजनेतील सर्व गावांची जिल्हा परिषदेच्या समितीच्यावतीने तपासणी पूर्ण झाली असून येत्या काही दिवसात या योजनेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत जिल्ह्यात बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य शासनाने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय आर. आर. पाटील सुंदर गाव योजना सुरु केली. या योजनेतून सुरुवातीला तालुकास्तरीय सुंदर गावाची निवड केली जाते. ही निवड गुणांकन पध्दतीने करुन पारितोषिक देण्यात येते. त्यानंतर याच पुरस्कारप्राप्त गावांना जिल्हास्तरीय सुंदर गाव योजनेसाठी पात्र ठरविण्यात येते. सातारा तालुक्यातून फत्यापूर, जावळी तालुक्यातून चोरांबे, कोरेगावमधून बर्गेवाडी, कराड तालुक्यातून तासवडे, खटावमधून फडतरवाडी (नेर), खंडाळा तालुक्यातून घाडगेवाडी,
फलटण तालुक्यातून जाधववाडी (फ), माण तालुक्यातून देवापूर, वाईमधून शेलारवाडी, महाबळेश्वर तालुक्यातून रामेघर, पाटण तालुक्यातून ढोरोशी या गावांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यातून निवड झालेल्या गावांमधून एका गावाची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेतील तालुकास्तरीय निवड झालेल्या गावांना दहा लाखांचे पारितोषिक देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी 40 लाखांचा पुरस्कार दिला जाणार आहे. जिल्हास्तरीय सुंदर गाव योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीच्यावतीने सर्व गावांची पाहणी पूर्ण झाली असल्याने सहभागी गावे जिल्हास्तरिय निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील कोणते गाव सुंदर गाव स्पर्धेत बाजी मारणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.