जळगाव – जळगावातील जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कुणाची याची प्रचीती येते. पाकिस्तानला जरी शिवसेना कुणाची विचारली तरी तो सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला हे समजत नाही. तसेच निवडून गेलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे माझ्यासोबत आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जळगावातील पाचोरा येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदेगटासह निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, काही जणांना असे वाटते की ते म्हणजे शिवसेना. आम्ही सभेत घुसणार असं काहीजण वल्गना करतात, पण निवडणुकीत त्यांच्या शेपटी आदळून त्यांची जागा दाखवावी. आज आर ओ पाटलांची उणीव भासते, एक कणखर आणि विश्वासू सहकारी जाणं हे परवडणारं नाही. अगदी चाळीस गद्दार जरी गेले तरी चालतील, पण एक विश्वासू सहकारी जाणं परवडत नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज भाजपकडून गाईला जेवढी सुरक्षा दिली जाते, तेवढी सुरक्षा येथील आईला दिली जात नाही. भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. ठाण्यातील रोषणी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. ती हात जोडून कळवळत असतानाही तिच्या पोटात मारले गेले. पण तिची तक्रार नोंदवून न घेता, उलट तिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप ज्या राज्यामध्ये सत्तेत नाही त्या राज्यांमध्ये गोहत्या बंदी करण्यासाठी दबाव टाकणार आणि त्यांच्या राज्यात मात्र गोहत्येवर बंदी घालायची नाही, अशी दुटप्पी भूमिका भाजपकडून घेतली जाते.
दरम्यान, सत्यपाल मलिक म्हणाले त्या प्रमाणे पुलवामा हल्ल्यामध्ये निष्काळजीपणा झाला असेल तर त्या शहीदांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
गद्दारांनी आपल्या पक्षाचे नाव चोरले आणि पक्ष चिन्ह चोरले. तुम्ही धनुष्यबाण चिन्हासोबत या, मोदींचे नाव वापरा आणि निवडणुकीला सामोरे जावे. मी मशाल चिन्हासह निवडणूक लढवतो. मग बघू महाराष्ट्र कुणाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र हा मिंधेंच्या नाही तर माझ्या मागे आहे, हे तुम्हाला समजेल. त्यांना विजयाची खात्री नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलत आहेत, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.