पिंपरी – गेल्या तीन दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव व सांगवी परिसरात 20 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला. या श्वानांना विषप्रयोग करुन व जाळून मारण्यात आले. श्वानांनी गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरात माणसांचा अमानुष चेहरा पाहिला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. 20 श्वानांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पशू वैद्यकीय विभाग जागा झाला असून विभागाच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
पिंपळे गुरव येथे क्रूरतेचा कहर करत श्वानांना विष देण्यात आल्याचे स्थानिक प्राणीप्रेमींनी सांगितले. नदीच्या किनारी, पाइपच्या जवळ, विटेवर मान ठेवत, चारचाकीच्या खाली तडफडून श्वानांनी प्राण सोडले. तर भोसरी परिसरात रिक्षात कोंबून कुत्र्याचे अपहरण करण्यात आले आणि त्याला दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली.
रात्रीच्या वेळी भुंकणे, सोसायट्यांच्या कचरा कुंड्यामधील कचरा विस्कटणे, गाडीच्या पाठीमागे लागणे अशा प्रकारांचा नागरिकांना त्रास होतो, परंतु ही कारणे क्षुल्लक असून मुक्या प्राण्यांचा जीव घेण्याइतपत नक्कीच गंभीर नसल्याने नागरिकांमधून हळहळ तर प्राणीमित्रांकडून संताप व्यक्त होत आहे.
श्वानांचा त्रास होतो म्हणून मारले की चोरासाठी मोकळे रान मिळावे, यासाठी तीन दिवसांमध्ये तब्बल वीस श्वानांचा खून करण्यात आला असल्याची चर्चा सध्या सांगवी-पिंपळे गुरव परिसरात सुरु आहे. विषप्रयोग केल्यानंतर काही श्वानांना पोत्यात घालून जाळल्याचेही सांगण्यात येत आहे.
कधी सुटणार समस्या?
महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे 80 हजारांच्या घरात आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र, याला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचे काम चार संस्थाना देण्यात आले आहे. सप्टेंबर 2019 पर्यंत सुमारे 15 हजार श्वानांचे निर्बिजीकरण झाल्याचा दावा महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने केला आहे. मात्र, सातत्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कोंबडी खाल्ली म्हणून…
लांडगेनगर-भोसरी येथे एकाने कुत्र्याने आपली कोंबडी खाल्ली म्हणून त्याला दांडक्याने मारहाण केली. तसेच रिक्षात कोंबून अज्ञात ठिकाणी नेले. प्राणीमित्र तरुणी नीत पंडित यांनी या क्रूर व्यक्तीविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतले आहे.
श्वानांचा मृत्यू होत असल्याचे कळताच घटनास्थळी धाव घेतली. तिथे गेल्यावर आणखी काही ठिकाणी श्वान मरुन पडले असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रयत्न केले, परंतु त्यांना वाचवू शकलो नाहीत. काही श्वानांचे पोस्टमार्टम आमच्या समक्ष करण्यात आले. त्यांना विषबाधा झाली असल्याचे दिसून आले. दोन कावळ्यांचाही मृत्यू झाला आहे. दाटीवाटीच्या नागरवस्ती भागात मुलांना खेळायला जागा मिळत नाही. यामुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर नकोसा झालाय. तर, कुत्री भुंकल्याने झोपमोड होत असल्याचा राग असू शकतो व चोरांना अडथळा ठरत असल्याच्या कारणातून सुद्धा हा प्रकार झाला असावा असे वाटते.
– विनायक बडदे, सरचिटणीस, वन्य पशू, पक्षी संरक्षण सामाजिक संस्था
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वानांच्या निर्बीजीकरणात हलगर्जीपणा केला जात आहे. तर, निर्बीजीकरण केल्यानंतर श्वानांना परत त्यांच्या क्षेत्रात न सोडता इतर ठिकाणी सोडल्याने श्वान चावा घेतात. श्वानांची संख्या नियंत्रणात आल्यास नागरिकांना त्रास होणार नाही. व्यक्तीगत रागातून एकमेकांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले केले जात असून प्राण्याबद्दल जनजागृतीचा अभाव असल्याने हा प्रकार घडला आहे.
– राजश्री शिर्के, प्राणी मित्र, जुनी सांगवी.