मुंबई – औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि कॉंग्रेस पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहे. कॉंग्रेसने औरंगाबाद शहराचे नामकरणास विरोध दर्शविला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. यावरून मनसेने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
मनसे नेता संदीप देशपांडे म्हणाले कि, जोपर्यंत शिवसेना सत्तेची लाचारी सोडत नाही. तोपर्यंत नामांतर करू शकत नाहीत. सत्तेत असताना शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. व या मुद्द्याला काँग्रेस पाठिंबा देणार नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेला सत्तेत राहाणे जमणार नाही. त्यामुळे आता शिवसेनेने ठरवायचे आहे. लाचारी करायची की अस्मिता बाळगून औरंगाबादचे संभाजीनगर नाव करायचे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले सर्वच घटक पक्ष एका किमान समान कार्यक्रमावर एकत्र आले आहेत. पण सध्या औरंगाबादचे नामांतर “संभाजीनगर’ असे करण्यावरून जो वाद समोर आला आहे आणि त्यावरून जी विविध प्रकारची मतांतरे व्यक्त केली जात आहेत, ती पाहता या विषयावरून शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यामधील संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता दिसत आहे.