कात्रज -कात्रज चौकात सकाळी 09:00 वाजल्यापासून रात्री उशीरार्यंत वाहतूक कोंडी होत आहे. कात्रज चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गेली अनेक वर्षापासून कायम आहे. मात्र, या वाहतूक कोंडीकडे सर्रासपणे महापालिका वाहतूक प्रशासन, विभाग पथ विभाग व अतिक्रमण प्रशासन व वाहतूक पोलीस नियंत्रण, पीएमपीएल बस विभाग यांचे दुर्लक्ष आहे. कात्रज चौकात थांबलेल्या पीएमपीएलच्या बसेसह खासगी ट्रॅव्हल्स्चे अनधिकृत थांबे. याशिवाय रिक्षा थांबा, शासनाच्या एसटी-पीएमपी बसेस, अनधिकृत प्रवासी वाहतूक करणारी वाहने, चौकातील रस्त्यालगत अनधिकृतपणे उभ्या असलेल्या टपऱ्या व खाद्यपदार्थांचे स्टॉल यातून रस्ता अपुरा पडून येथे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
कात्रज चौकामध्ये सुरू असलेले उड्डाणपुराचे काम तसेच या चौकामध्ये असलेले पीएमपीचे तीन बस स्टॅन्ड यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय रिक्षा स्टॅन्ड, खासगी प्रवासी वाहने यामुळे होणारी गर्दी त्यातच चौकालगत दुकानांबाहेर अनधिकृतपणे थांबणारे पोट भाडेकरू व पथारीवाले यांनी केलेली अतिक्रमण यामुळे या चौकामध्ये वाहतूक कोंडीची समस्या रोजचीच झाली आहे.
“मिशन कात्रज क्लीन’ उपक्रम
भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस नियंत्रण विभागातील वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणी यांनी 2019 मध्ये राबविलेला “मिशन कात्रज क्लीन’ उपक्रमांतर्गत कात्रज चौकातील अनेक अनधिकृत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तसेच पीएमपीएल बसेसवर देखील कारवाई करण्यात येत होती, अशाच पद्धतीचे प्रयत्न पुन्हा होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.