नगर – जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेगात सुरू आहे. जिल्ह्यातील 21 कारखान्यांनी आतापर्यंत 78 लाख 31 हजार 811 मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून त्याद्वारे 72 लाख 38 हजार 520 क्विंटल साखर तयार केली आहे. यावेळी कारखान्यांचा साखर उतारा मात्र घटल्याचे दिसत आहे. या गाळपात श्री अंबिका शुगर हा खासगी कारखाना आघाडीवर असून या कारखान्याने आतापर्यंत 9 लाख 84 हजार 454 मे. टन गाळप केले आहे.
जिल्ह्यात कारखान्यांचे गाळप जोरात सुरू झाले आहे. जिल्ह्यातील 22 कारखान्यांपैकी 21 कारखान्यांचे गाळप सुरू आहे. यामध्ये जवळपास 13 कारखाने सहकारी तर 8 कारखाने खासगी आहेत. काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस कमी असल्याने अन्य कार्यक्षेत्रातील ऊस प्रथम आणून गाळप सुरू झाले आहे. गाळप हंगाम सुरू झाल्यापासून 78 लाख मेट्रीक टन ऊस गाळप करण्यात आले आहे. हा आकडा सातत्याने वाढत चालला आहे.
साखर निर्मितीत अंबिका शुगर कारखाना आघाडीवर असून या कारखान्याने आतापर्यंत 9 लाख 94 हजार 850 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. दुसऱ्या क्रमांकावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना असून या कारखान्याने 7 लाख 20 हजार 250 क्विंटल साखर तयार केली आहे. कारखान्यांचे गाळप सध्या वेगात सुरू आहे. लम्पी आजाराचे संकटही आता कमी झाले आहे. त्यामुळे कारखान्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत.
ऊस गाळप (कंसात साखर उत्पादन)
संजीवनी 3,92,747 (3,01,175), कोपरगाव 2,76,157 (2,93,900), अशोक 3,45,520 (3,39,900), प्रवरा 5,14,700 (3,71,500), कुकडी 3,72,950 (3,67,050), श्रीगोंदा 4,64,920 (4,52,200), थोरात 6,42,530 (7,20,250), ज्ञानेश्वर 7,01,400 (6,43,950), वृद्धेश्वर 2,48,270 (2,47,150), मुळा 5,95,010 (4,21,500), अगस्ती 2,62,637 (2,71,730)
साखर उताऱ्यात पुन्हा थोरातच आघाडीवर
साखर उताऱ्यात यावेळी थोरात कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा साखर उतारा 11.21 टक्के आहे. तर कोपरगाव कारखान्याचा साखर उतारा 10.64 टक्के इतका राहिला आहे. वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याचा उतारा 10.35 टक्के तर गाळपात आघाडीवर असलेल्या अंबिका कारखान्याचा साखर उतारा 10.11 टक्के राहिला आहे. कारखान्यांचा साखर उतारा घटला आहे.