काम केवळ 60 ते 65 टक्क्यांच्या आसपास
ठेकेदार-अधिकाऱ्यांच्या मनमानीचा नमुना
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येणाऱ्या पुलासाठी पालिकेकडून देण्यात आलेली मुदत संपुष्टात आली आहे. ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये पुलाचे केवळ 60 ते 65 टक्के इतकेच काम झाले असून, या पुलाला आता मुदतवाढ देण्यात येणार आहे. मुदत वाढल्यानंतर येणाऱ्या वाढीव खर्चाचा बोजा पालिकेवर पडणार असून, अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात येणार आहे. या पुलाच्या विलंबाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेला उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर, वर्तुळाकार मार्ग या प्रकल्पाची मुदत 26 डिसेंबर रोजी संपली आहे. तीन वर्षांच्या मुदतीत केवळ 60 ते 65 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता या कामासाठी आणखी मुदतवाढ मिळावी म्हणून ठेकेदाराने महापालिकेकडे मागणी केली आहे. याला अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. मुदतीत काम पूर्ण न करण्याचा सपाटाच ठेकेदारांनी चालविला असताना अधिकारीही त्यांनाच साथ देत असल्यामुळे या दोघांच्या संगणमताने सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची मात्र अव्याहतपणे उधळपट्टी सुरू आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी 90 कोटी 53 लाख रुपये खर्चून उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि वर्तुळाकार मार्ग करण्यात येणार आहे. महापालिकेने बी. जी. शिर्के या ठेकेदाराला 26 जून 2017 रोजी या कामाचा आदेश देण्यात आला होता. तसेच कामाची मुदत 30 महिने म्हणजे 26 डिसेंबर 2019 पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत नुकतीच संपली आहे. ठेकेदाराने या कामाला पुन्हा मुदतवाढ मागितली आहे. उड्डाणपुलाचे काम अर्धवट अवस्थेत असून, नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुदतवाढ होणार असल्याने खर्चही वाढणार आहे. या वाढीव खर्चाला अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे. ठेकेदार, सत्ताधारी आणि प्रशासन असे त्रिकुट गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांचा कररुपाने जमा झालेल्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
वाहतूक कोंडीत भर
भक्ती-शक्ती हे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार समजले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पुलाच्या कामामुळे या चौकातील अनेक मार्ग वेगवेगळ्या दिशेला वळविण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. प्रत्येक मार्गावरून चौकात येण्यासाठी वळसा घालून यावे लागत आहे. त्यातच या ठिकाणी बस टर्मिनस असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यातच कामामुळे चौकातील रस्ते खराब झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, ठेकेदाराचे भले करण्यासाठी कामात दिरंगाई करणाऱ्या पालिका प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे.