नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, राजधानी दिल्लीसह शेजारील राज्यांमधे काल यंदाच्या हंगामातले सर्वात कमी तापमान नोंदले गेले. दिल्ली आणि इतर आसपासच्या राज्यात तापमान दोन अंश सेल्सियसच्याही खाली होते. दाट धुके आणि दृष्यमानता कमी झाल्याने विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतूक खोळंबली होती.
हवेतली दृष्यमानता कमी झाल्याने, दिल्ली विमानतळावरुन होणारी विमान वाहतूक विस्कळीत झाली असून, चार विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दाट धुक्यामुळे 24 रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, या गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावणार आहेत.
उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग स्की रिसॉर्टमध्ये काल रात्री उणे 6.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हे खोऱ्यातील सर्वात थंड ठिकाण ठरले.
येथे रात्रीचे तापमान उणे 10.4 अंश सेल्सिअस इतके होते. लडाख केंद्र शासित प्रदेशातील लेह शहरात किमान तापमान उणे 19 अंश सेल्सिअसची नोंद झाली. द्रास शहरात उणे 28.7 डिग्री सेल्सियसच्या किमान तापमान आहे.
बिहारमध्ये शीतलहरीचा सामान्य जीवनावर परिणाम झाला आहे.
तेथे थंडीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्ये, सिकर जिल्ह्यातील फतेहपूर येथे राज्यात सर्वात कमी तापमान वजा 4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हरियाणा आणि पंजाबमधील बर्याच ठिकाणी किमान तापमान सामान्यपेक्षा 5 ते 7 अंशांपेक्षा कमी होते.