सातारा – परळी आणि चाळकेवाडीच्या पट्ट्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. मुंबईतील कांदिवलीतून वावदरे (ता. सातारा) येथे आलेल्या नऊ जणांच्या कुटुंबातील 56 वर्षांचा वृद्ध करोनाबाधित असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे. या कुटुंबाचे घर गावाच्या एका टोकाला असून घरालगतचा अर्धा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
गटविकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी. पवार व जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाने गुरुवारी दुपारी गावात जाऊन या कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली. साताऱ्यापासून 25 किमीवर असलेल्या गावात बुधवारी रात्रीपासून तणावपूर्ण शांतता आहे. ठोसेघर रस्त्यावर राजापुरी फाट्यापासून काही किमी अंतरावर असलेल्या वावदरेची लोकसंख्या दीडशेच्या आसपास आहे. गावात वर्षभरात कधीच धावपळ नसते; परंतु गेल्या पंधरवड्यात मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची वर्दळवाढली होती.
मूळचे वावदरे येथील कुटुंब कांदिवलीत स्थायिक झाले असून मुंबईतील करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे हे कुटुंब 20 मे रोजी गावात परतले. येण्यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीला कल्पना दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते. या कुटुंबाचे घर एका बाजूला असल्याने तशी भीती नव्हती; पण मुंबईतून आल्यापासून या कुटुंबातील 56 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्याची करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली. या कुटुंबातील तीन सदस्य हाय रिस्क कॉंटॅक्ट व चार जण लो रिस्क कॉंटॅक्ट असून त्यांना करोना चाचण्यांसाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.