13 वर्षांपासून राहत होते विभक्त : समुपदेशन ठरले महत्त्वाचे
पुणे – मुलाच्या भवितव्याचा विचार करत घटस्फोटानंतर तब्बल चार वर्षांनी पुन्हा ते दोघे एकत्र आले. समुपदेशानामुळे हे शक्य झाले. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांनी दिलेला घटस्फोटाचा निर्णय दोघांच्या अर्जानंतर सत्र न्यायाधीशांनी रद्द केला. दोघात पुन्हा पती-पत्नीचे नाते निर्माण झाले. दोघांनी नव्याने संसार करण्यास सुरूवात केली आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. माधवच्या वतीने न्यायालयात ऍड. के.टी. आरू-पाटील आणि ऍड. मनिषा शेट्टी यांनी काम पाहिले. दोघांना 13 वर्षाचा मुलगा आहे. कौटुंबिक कलहामुळे मुलगा झाल्यानंतर सहा महिन्यांनी ती माहेरी गेली ती परतलीच नाही. पतीने तिने संसारासाठी पुन्हा सासरी यावे, यासाठी प्रयत्न केले. मात्र, ती परत आलीच नाही. त्यामुळे हे प्रकरण 2013 मध्ये न्यायालयात पोहोचले.
पतीने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर येथे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दोघे विभक्त राहत असल्याच्या मुद्यावर 2017 मध्ये न्यायालयाने दोघांचा घटस्फोट मंजुर केला. त्यानंतर याविरोधात पत्नीने 2018 मध्ये सत्र न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान समुपदेशनामध्ये मुलाचे भवितव्यविषयी सांगण्यात आले. तिला पुन्हा नांदण्यास जाण्यास सांगितले. त्यानुसार ती नांदण्यास तयार झाली. त्यानंतर याबाबत सत्र न्यायालयात अर्ज केला. तो अर्ज मंजुर करून न्यायालयाने दोघांना नव्याने संसार सुरू करण्यास परवानगी दिली.